भरती ओहोटी भाग अंतिम
✍️ प्रतिभा परांजपे
भाग दोन 👉 भाग दोन
सुमित्राचे बोलणे ऐकून आशा म्हणाली, "तुझ्या सर्व शंका रास्तच आहेत. पण तरीही मला वाटते सुमी तू लगेच नकार किंवा होकार नको देऊ.
तू त्यांना पूर्वीपासून ओळखतेस ते सर्व आठव, विचार कर. तुझ्या त्यांच्याविषयीच्या भावना , त्यांचे तू पाहिलेले व ऐकलेले कॅरेक्टर. मुख्य म्हणजे त्यांनी स्वतः तुला मागणी घातली आहे म्हणजे त्यांना तू नक्कीच खूप आवडते. तू त्यांच्याकडून वेळ मागून घे. त्यांच्याशी फोनवर संपर्कात राहा, एक दोनदा भेट व मग ठरव.
एकटं राहणं तेवढंच कठीण असतं मी ते अनुभवलं आहे ,हे गेल्यानंतर".
"मुलांना आपली काळजी असते ग पण तरीही त्यांचे आपले स्वतःचे एक विश्व असते त्यामुळे कुठेतरी एकटेपण जाणवते.
सुख तुझ्यापुढे स्वतः येऊन उभे आहे, ते तुला साद घालते आहे तेव्हा मनाचा कौल घे. मग निर्णय घे. घाईघाईने नकार देऊ नको. मुलांशी ही बोल ते समजून घेतील.काही वेळ जाऊ दे."
निघताना सुमित्राने आशाला घट्ट मिठी मारली तेव्हा हसत हसत, "अगं सुमि एवढ्यात तुझी पाठवणी नाही करतिए " म्हणत आशाने निरोप दिला.
टॅक्सीने परतताना सुमित्राने सतीशचा नंबर सेव्ह करून मोबाईल पर्समध्ये ठेवला.
संकेतच्या रडण्याचा आवाज बाहेरपर्यंत येत होता.
"ती बघ आली आज्जी चूप रहा आता," अर्चनाने सुमित्राला येताना पाहून म्हटले.
"आजी कुठे गेली होतीस"? अरे हो हो म्हणत संकेतला सुमित्राने जवळ घेतले.
"काय म्हणतात आशा मावशी? खूप वर्षांनी भेटला ना तुम्ही आई खूप गप्पा झाल्या असतील". अर्चनाचे प्रश्न सुरू होते सुमित्रा हं-हं करत होती पण मन अजूनही अस्थिर होते.
रात्री झोपताना ती स्वतःशीच संवाद करू लागली.
आपण कां गेलो? त्यांनी बोलावले म्हणून, काय आहे आपल्या मनात. आशा म्हणाली त्याप्रमाणे, भेटावे का परत त्यांना. पण त्याआधी आपल्याला नेमके काय हवे आहे ते जाणून घ्यायला हवे.
आपल्याला ते आवडतात ते फक्त मैत्री म्हणून कि आणखीन काही. लग्न करावे असे काही आहे का?
सतीशना मी आवडले , त्यांनी मागणी घातली पण लग्न म्हणजे भावनिक पातळीबरोबर इतरही अपेक्षा असतीलच. पण आपलं मन त्यासाठी तयार होईल का? सगळाच गुंता आहे. विचार करून डोक जड व्हायला लागले.
दोन दिवस सुमित्रा सारखा फोन हातात घेई व परत खाली ठेवी. करू की नको, मनात आंदोलन सुरू होते. अर्चनाने एकदा विचारलेही, "संपदा ताईंचा फोन येण्याची वाट पहात आहात कां मग करून घ्या ना तुम्हीच."
काय करावे, मुलांशी बोलण्याआधी आपल्याला नेमका निर्णय घ्यायलाच हवा.
तिने सतीशच्या नंबर वर एस एम एस केला. तुमची हरकत नसेल तर एकदा तुमच्याशी बोलायचे आहे कुठल्याही निर्णयावर जायच्या आधी.
तिकडून रिप्लाय, कुठे?
त्याच जागी.
यावेळेस सतीशना पाहताच तिच्या चेहऱ्यावर स्माईल आले. बऱ्याच वेळ नुसतेच ती ऐकत होती. ते बोलत होते.
"तुम्ही काही बोला, तुमच्या मनात ज्या शंका आहेत त्या दूर व्हायला हव्या."
सुमित्राने मग हळूहळू आपले अंतरंग उघडायला सुरुवात केली पण अजून हवा तेवढा विश्वास वाटत नव्हता.
"बरं निघूया का?"
"परत केव्हा भेटू ,फोन केला तर चालेल?"
"नक्कीच", म्हणत सुमित्रा उठली.
आता घरात तिचे मन फोनच्या घंटीकडे सारखे लागलेले असायचे. हे बावरलेले पण! तिचं तिलाच वाटू लागले एखाद्या नवतरुणी सारखी आपली मनस्थिती का होतीए?
सतीशने दोन दिवसांनी फोन केला फोनवर दोघे बरेच वेळ बोलले.
"कोणाचा फोन होता ? संपदा ताईंचा कां ,त्यांना सांगा एवढ्यात तुम्ही नाही येत आहात म्हणून".
सुमित्राला ही अजून येथे रहावे असेच वाटत होते पण शाळा लवकरच सुरू होईल त्याचे काय.?
रात्री जेवताना आशिष व अर्चना बोलत होते. अर्चना ऑफिसमधल्या गोष्टी सांगत असताना मधेच म्हणाली, "अरे, आज घरी परत येताना सतीश साने काका दिसले, बोलले मी त्यांच्याशी."
"कोण साने"? आशिष.
"अरे ते इंदोरला बाबा दवाखान्यात असताना नाही का एक दोनदा बाबांना पाहायला आले होते. ते औषध आणून देत असत मला खाली जावे ना लागो म्हणून."
"अच्छा, ते... He is such a good person".
सुमित्राच्या कानावर सतीशच नांव पडताच हृदयाचे ठोके वाढल्यासारखे झाले. काही कळले तर नाही मुलांना.
संकेतच्या वाढदिवसाला मी नक्की येईन असे कबूल करून सुमित्रा इंदोरला परतली.
बरेच दिवस मग तिने सतीशना फोन हि नाही केला.
शाळेचे काम सुरू झाले छोटी छोटी मुले त्यांची मस्ती, गोंगाट पण या वेळेस सुमित्राचे मन त्यात रमत नव्हते.
संपदा तिची मुलगी पण तिलाही सुमित्राचे वेगळेपण जाणवू लागले .
एक दिवस तिने सहजच म्हणून विचारले, "आई तू अशिष कडून आल्यापासून मला सारखे जाणवते आहे की काहीतरी मिसिंग आहे तू पूर्वीसारखी नाही वाटत. तिथे काय असे घडले?"
सुमित्राने सर्व जसे घडले तसे संपदाला सांगितले.
संपदा काहीच बोलली नाही. ती घरी निघून गेल्यावर सुमित्राचे मन उदास झाले . मुलगी जरी बोलली नाही तरी तिला अशोकच्या ,तिच्या बाबांच्याजागी दुसऱ कोणी ही कल्पना आवडली नसावी.
सतीशचे फोन, मेसेज येत होते पण सुमित्राने काहीच रिप्लाय दिला नाही.
मुलांना दुखावून, त्यांच्यापासून दूर जाऊन तिला सतीशशी संसार नव्हता करायचा.
संध्याकाळी संपदाचा फोन, "आई संकेतच्या वाढदिवसाला तू चलणार आहेस ना आम्ही जाणार आहोत आशिष अर्चनाचा खूपच आग्रह आहे."
सुमित्राने न जाण्याचे ठरवले. गेलो की उगाचच सतीशना भेटावेसे वाटेल. मुलांसमोर तमाशा नको. शाळेच्या कामाचे कारण पुढे करून तिने सांगितले, "तुम्ही जाऊन या माझ्याकडून त्याला छान ड्रेस व खाऊ घेऊन जा."
चार-पाच दिवसांनी सकाळी सकाळीच संपदा घरी हजर. पूर्वीसारखी उत्साहात दिसत होती.
सुमित्राला बरे वाटले.
"तुझी खुप आठवण करत होता ग संकेत. तू केव्हा येणार म्हणून ही विचारत होता".
"जाईन ग पुढे कधीतरी", म्हणून सुमित्रा विषय संपवू पाहत होती.
"आई वाढदिवसाला साने काकांना ही निमंत्रण होते . आशा मावशी ही आली होती. खरं सांगू आई, खूप चांगले आहेत ते. मागे मी त्यांना भेटलेली आहे पण यावेळेस मी वेगळ्या नजरेने त्यांना पाहिले. खूप खूप साधे पण हसतमुख हेल्पिंग नेचर वाटले. रात्री पाऊस सुरू झाला म्हणून आशा मावशींना पण स्वतःच्या गाडीने घरी सोडले मग त्या रात्री मी आशिष अर्चनाजवळ तुमच्याबद्दल बोलले."
सुमित्राला एकदम नर्वस वाटायला लागले. अर्चना आशिषची काय बरं रिएक्शन असेल,?
"आई, अर्चना तर खूपच एक्साईट झाली, तिला खूप आनंद झाला. म्हणाली, अरे वा !मग आई मला का नाही बोलल्या?"
"आणि आशिष?"
"तो फारसे नाही बोलला पण मिस्टर साने चांगले आहेत असे जरूर म्हणाला.
दुसरे दिवशी आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो. त्यांच्या घरातले काय म्हणतात हे हे कळायला हवे ना? सतीश काका मुद्दामच बाहेर फिरायला म्हणून निघून गेले. त्यांची सून व मुलगा दोघेही खुपच मॅच्युअर वाटले, म्हणाले बाबा जर या रिलेशनने खुश असतील तर मग आम्हाला काहीच ऑब्जेक्शन नाही त्यांना तुला ही पाहायची उत्सुकता आहे. म्हणत होते बाबांजवळ तुझा फोटो आहे का?
स्टेशनवर आम्हाला पोचवायला काका सॉरी तुझे 'हे 'आले होते. आम्ही त्यांना इथे यायचे निमंत्रण ही दिले." संपदाने हसत सांगितले.
दोन-तीन दिवस जे वादळ माजले होते मन सागरात जे तुफान आले होते सगळीकडे उदासीचे काळे मेघ दाटले होते ते संपदाच्या या बोलण्याने अचानक विरून गेले. आशेची एक किरण त्या मन आकाशात चमकू लागली.
सतीश बरोबरच्या सहजीवनाची इंद्रधनुष्यी वाट सुमित्राला दिसू लागली.
--------------------------------------------------------------
(समाप्त)
वरील कथा प्रतिभा परांजपे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.
ही कथा तुम्हाला आवडेल.👇
सुंदर कथा
ReplyDelete