शापित भाग चार

शापित  भाग -४

मागील भाग इथे वाचा

 👇

भाग तीन

माधवने गच्च डोळे मिटले  आणि  देवाचा धावा केला. "हे परमेश्वरा!!जर माझ्याकडुन काही पाप झाले असेल तर मला माफ कर पण माझी आणि या निष्पाप लोकांची यातून सुटका कर." माधव  जिवाच्या आकांताने ओरडला.


ते सगळे पिशाच्च बसजवळ एव्हाना पोहचले होते. खूपच चित्र विचित्र आवाज येऊ लागले, ते जोरजोरात बसला धक्के मारू लागले, नखाने बसवर खरडायचा गुरगुर करायचा आवाज कोणत्याही सामान्य माणसाची मनस्थिती खराब करायला पुरेसा होता.


सगळ्यांनी एकदमच बसवर हल्ला केला. गाडीच्या काचावर त्यांचे सडलेले किळसवाणे हात दिसू लागले. हाताच्या वाढलेली नखांमुळे कांचावर जोर जोरात चरे पडत होती. आता कोणत्याही क्षणी कांचा फोडून ते सगळे आत येतील आणि आपला फडशा पाडतील हाच विचार सगळ्यांच्या मनात येत होता.


माधवने मनात पक्का निश्चय केला आणि तो जोरात ओरडुन बोलला "आपल्याला यांचा सामना केलाच पाहिजे असं घाबरून चालणार नाही. खिडक्यांपासून दूर राहा हातात जे येईल त्याने मारायचा प्रयत्न करा शक्य तो त्यांच्या डोळ्यात बघू नका."


सगळ्यांनी शोधाशोध केली. काही मिळतय का म्हणून .


आता बरेच पिशाच बसच्या वर चढले होते. जोर जोरात त्यावर हात आपटत होते. बाकी  बसच्या मागच्या खिडकीतून चढन्याचा प्रयत्न करत होते. त्यातून एक जण मधे घुसला त्याने एक प्रवाश्याला बाहेर खेचून घेतले. जसं त्याने बाहेर उडी टाकली तसेच सगळे त्यावर अधाष्या ॉसारखे तुटून पडले.


एका मिनिटांतच त्यांनी त्याचा फडशा पाडला. मागे आता फक्त त्या व्यक्तीचा हाडाचा भुगा दिसत होता. हा सगळा प्रकार पाहून बसमधले प्रवासी अजूनच घाबरले. इकडे तिकडे धावू लागले आरडाओरडा करू लागले. असे अमानवीय कृत्य बघणं सगळ्यांच्या कल्पने पलीकडे होते. रात्रीच्या त्यावेळी पिशाच्च आणि मानव यात घमासान असे युद्ध सुरू होते काय करावे? काही ही समजत नव्हते.


माधव ओरडतच होता शांत रहा!! म्हणून पण आता कुणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.


आतमधे ते सगळे प्रवासी आणि त्यांच्या चारी बाजूंनी ते पिशाच्च मुंग्यासारखे बसला लटकलेले होते. त्यांच्या डोळ्यात भूक स्पष्ट दिसत होती. ते सारखे गुर गुरत होते आणि लाळ गाळत होते.


तेवढ्यातच एक म्हातारी बाई, "माझा मुलगा ! माझा मुलगा!" म्हणून ओरडू लागली आणि त्या पिशाचाच्या दिशेने जाऊ लागली. जशी ती खिडकी जवळ गेली तसेच कांच फोडून त्याने तिला बाहेर ओढले. मागून तिचे पाय लोकांनी ओढले पण त्यांच्या शक्ती पुढे यांचं काहीही चाललं नाही. ती म्हातारी त्यांच्या हातात सापडली तशी एक मिनिटातच त्यांनी तिला खाऊन टाकल.


आता प्रत्येकाला त्यात आपले जवळचे नातलग दिसू लागले. जे आता हयात नव्हते. माधवला पण त्याचे मेलेले वडील त्यात दिसू लागले पण माधव एका झटक्यात त्या भ्रमातून बाहेर आला. बाकी लोकांना पण तो सांगू लागला.


"हा सगळा भ्रम आहे कुणी ही त्यावर विश्वास करू नका. दूर व्हा खिडकीपासून "


तोवर जवळ जवळ दोन तीन प्रवासी त्यांच्या तावडीत सापडले होते. आता त्यातून दोन तीन पिशाच बसच्या आत घुसले होते.


माधव पूर्ण शक्तिनिशी त्याचा मुकाबला करत होता. त्याने आपल्या बॅगने  प्रतिकार करण्याचा प्रयत्न चालू ठेवला.


बाकी तरुण मंडळी पण असाच काही प्रयत्न करत होते.


एक अनोळखी गावात चंद्रप्रकाशात मानव आणि अमानवीय शक्ती यांचे असे युद्ध सुरू होते .


माधवला जोरात कुणाचा  तरी धक्का लागला आणि तो खाली पडला.


आता एक पिशाच त्याच्यावर हल्ला करणारच होता.  तसा त्याचा हात त्याने आणलेल्या गंगाजलच्या कॅनला लागला. त्याने क्षणाचा ही विलंब न करता ती कॅन ओढली.


अस म्हणतात ना बुडत्याला काठीचा आधार.



गंगाजल अतिशय पवित्र असते. हे माधवला माहीत होते. त्याचा काही उपयोग होतो का हे बघण्यासाठी त्याने घाईघाईने कॅनचे झाकण उघडले आणि हातात जेवढे येईल तेवढे गंगाजल त्यांच्या अंगावर फेकले. जसेच त्याने ते फेकले तसाच तो झटका लागल्यासारखा ओरडतच खिडकीतून बाहेर पडला.


आता माधवला एक काही तरी उपाय भेटला होता. त्याने पटकन उठून गाडीत असणारा पिशाचाच्या अंगावर गंगाजल फेकले तसेच ते पटापट बाहेर पडले. अजून एक कॅन एका मुला

च्या हातात देऊन सगळ्याच्या अंगावर टाक अशी खूण केली.



त्याने खिडकीतून जमेल तेवढे गंगाजल त्यांच्या अंगावर टाकले होते. त्याचा फार वेळ निभाव लागण जरी शक्य नसल तरी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करणं हा माधवचा स्वभावच होता..


गंगाजलच्या प्रभावाने त्यांची शक्ती क्षीण होत होती. तसेच ते आता जास्तच रागात येत होते. विशेष करून माधवच्या दिशेने .माधवने गंगाजल टाकायचे सुरूच ठेवले.सपण आता गंगाजल ही संपत आले होते आणि बरेच पिशाच बसवर तांडव करत होते. 


त्याने ड्रायव्हर कडच्या खिडकीतून वर जायचा निर्णय घेतला.


तो तिकडून वर चढून गेला. जसं जमेल तस त्यांना तो खाली पाडत होता खालून गंगाजलची कॅन एकाने वर फेकली त्यातून बरच गंगाजल खाली सांडले. तशीच ती उचलून होते नव्हते तेवढं सगळं गंगाजल त्याने त्याच्यावर फेकले.


तसेच जमेल तसे धक्का, लाथा, बुकक्यांनी त्यांना खाली पाडलं.


खूप वेळ त्यांचं हे युद्ध सुरूच होत. पण माधवला ते स्पर्शही करू शकले नाही.


आता जवळ जवळ मध्यरात्र पण उलटली होती. हातातले सावज निसटलेलं बघून सगळे एकदम रागाने जोरजोरात किंचाळत होते.


त्या रात्रीत त्यांचं ते ओरडणं ऐकून हृदय विकाराचा झटका जर कुणाला आला तर त्यात नवल नाही. 



आता पहाटे चे तीन वाजत असावेत. बहुतेक ब्रह्म मुहूर्त झाला होता. तसेच ते सगळे गावाकडे वळले. रात्री एक पाय ओढत ओढत चालणारे आत्ता फटाफट त्यांच्या त्यांच्या घरात शिरले. त्यांना परत जाताना बघून सगळ्यांच्याच  जीवात जीव आला.


सगळे जण खूप थकले होते. माधव पण आता खूप थकला होता


रात्रभर चालणारा तो मृत्यूचा थयथयाट आता थांबला होता.


सगळे जण एकमेकाच्या गळ्यात गळे टाकून रडू लागली.


आपण वाचलो याचा आनंद तर होताच पण काही जणांनी आपले जीव गमावले होते त्यांचे नातेवाईक दुःखी होऊन रडत होते.


खूप वेळ कुणी ही काही ही बोलले नाही. हे सगळ एक स्वप्न आहे आणि आता आपण झोपेतून जागे होऊ तेव्हा आपआपल्या घरात असू असंच सगळ्यांना वाटत होते. काय झाले का झाले याचा आता विचार करण्याची कुणाचीच क्षमता राहिली नव्हती.


थकव्याने आणि भुकेने सगळ्यांना ग्लानी येऊ लागली.


काही जणं खूप जखमी झाले होते. वेदनेने विव्हळत होते .


माधव तसाच बसच्यावर बसून होता .


कदाचित मधे खूप वेळ गेला असावा. सूर्याची किरणे माधववर पडली तसा तो जागा झाला. खाली उतरून त्याने सगळ्यांना आपण आता सुरक्षित आहोत असं सांगितलं.


जे काही रात्री झालं त्या धक्क्यातून बरीच जन बाहेर पडली नव्हती.


त्यांची मानसिक स्थिती बिघडली होती. लहान मुले तर तापाने फणफणत होती. माधवने सगळ्यांना भानावर आणले आणि सांगितले, "मला माफ करा आम्ही जेव्हा सकाळी गावात गेलो तेव्हा ही सगळे गावकरी मेलेल्या अवस्थेत पडलेली होती पण आम्ही तुम्हाला त्याबद्दल काहीही सांगितलं नाही. आम्हाला जरा ही कल्पना असती असे सगळे घडेल तर काल सकाळीच आपण इथून निघून गेलो असतो." आणि असं म्हणून माधव रडू लागला.


त्याच्या या बोलण्यावर कुणीच काहीही बोलले नाही.


माधवने सगळ्यांना बसच्या खाली उतरायला सांगितले पण कुणाचीच हिम्मत होत नव्हती. मग तो स्वतःच उतरला. अंगावर सूर्यकिरणे पडली तस थोड बर वाटलं. त्याला बघून अजून काही जणांनी खाली उतरायची हिम्मत केली.


काही जण त्याचे पाय धरून रडायला लागली, "तुम्ही होता म्हणून आम्ही यातून वाचलो नाही तर आम्ही आशा सोडली होती." एक जन बोलला.


माधवने पाय दूर घेतले.


"अस नका म्हणू मी पण तर वाचलो ना, खर तर त्या बाबांना धन्यवाद दिले पाहिजे ज्यांनी हे गंगाजल मला दिले होते. कदाचि माझ्यावर असे संकट येणार आहे अशी त्यांना पूर्व कल्पना होती. परमेश्वर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपली मदत नक्की करतो ह्यावर आता माझा पूर्ण विश्वास बसला आहे."



पण पुढे काय? एकाने प्रश्न केला.



पुढे काय होईल माधव आणि बसचे प्रवासी यातून बाहेर कसे निघणार काय आहे ह्या पिशाच्चाचे रहस्य.


नक्की वाचा पुढच्या भागात.

क्रमशः 

पुढील भाग इथे वाचा

👇

भाग पाच

✍️सोनाली जाधव


वरील कथा सोनाली जाधव यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्द चाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित 


Post a Comment (0)
Previous Post Next Post