व्यवहार आणि नाती

 व्यवहार आणि नाती

लेखिका..प्रतिभा परांजपे


"अरे सुभाष आज सकाळी तुझ्या लाडक्या बहिणीचा म्हणजे सुनिताचा फोन आला होता." सुशिला बाई म्हणाल्या.


"अरे वा आज कशी काय  आठवण आली?" वहिनी म्हणाली.


"काय म्हणते आपली लाडोबा सगळे ठीक आहे ना?" सहजच केला कि...


"ते माहीत नाही. येणार आहे, काही काम आहे तुझ्याकडे म्हणत होती."


"अरे वा माझ्याकडे? भाऊजींशी भांडून तर नाही ना येते?"


"आता काय लहान आहे का रे भांडून यायला ? झाली न दहा वर्ष लग्नाला." आईने लेकीची बाजू घेत म्हटलं.


सुनिता आणि सुभाष हे दोघं सख्खे भाऊ, बहिण. सुनिताचा नवरा सुनील खूप हुशार व मेहनती. तो एका चांगल्या कंपनीत नोकरी करत होता. सुनीता ही शिकलेली पण नोकरी न करता घरं सांभाळत होती.


सुभाष सुनितापेक्षा मोठा. तोही चांगल्या कंपनीत मॅनेजर, स्वभावानी प्रेमळ. त्याला साजेशी त्याची बायको अलका. सुशिलाबाईचे यजमान जाऊन बरीच वर्ष झाली. त्यांची शेतीवाडी होती .




संध्याकाळपर्यंत सुनिता माहेरी पोहोचली. तिला पाहून आई, वहिनी, दादा सगळेच खुश झाले. वहिनीने नणंदेसाठी स्पेशल तिला आवडतात म्हणून गुलाब जाम व छोले केले. सर्वानी आनंदाने जेवण केले. "अजून काही फरमाईश ग?"


"आल्यासारख्या रहा आता."  वहिनी म्हणाली .


"नाही ग, दोन दिवसात लगेच जाईन."


"काय ग तुम्ही मुली आल्या काय नी .." वहीनीने थट्टा केली. "जरा रहा आईला ही बरं वाटेल."


"नंतर येईन ग आता नाही जमणार."



  "कां, एवढ्या तातडीने येणे- जाणे, सर्व ठीक आहे ना?" आईने विचारले. 



"हो अग ठीक आहे पण–-- दादाशी बोलायचं आहे."



रात्री जेवण झाल्यावर सुभाषने विचारले तेव्हा सुनीता म्हणाली, "थोडी मदत हवी होती पैशांची यांना बिझनेस करता. तशी थोडी व्यवस्था झाली आहे पण–"


"कशाचा बिझनेस? नोकरी सोडून?" वहिनीने विचारले.



"किती लागतील?" सुभाषने विचारले.



 "पाच(लाख) मिळाले तर बरं होईल.. म्हणजे हे उद्या येतात आहे ते सांगतील सगळा प्लॅन."


 "ठीक मी करतो व्यवस्था उद्यापर्यंत."



दुसरे दिवशी सुभाष ने पाच लाखाचा चेक तयार करून सुनिताच्या हातात दिला, तेव्हा आई  व वहिनी तिचेच होत्या. 

"बघ अजून गरज पडली तर सांग."



"मी काय म्हणते सुभाष", आई म्हणाली,  "तुम्ही दोघे सख्खी भावंड आहात. एकमेकांना प्रसंगी मदत करणं हे तुमचं कर्तव्यच आहे. त्यातूनच एकमेकांविषयीची काळजी, प्रेम जाणवत. पण नातं आणि व्यवहार या दोन्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतात. त्यात सरमिसळ नको. नात्यात व्यवहार नको आणि व्यवहारात नातं पाहू नये असं मला वाटतं."



"म्हणजे तुला काय म्हणायचं?"  सुभाषने विचारले.



" बहिणीला वेळ प्रसंगी मदत करायलाच हवी पण पैशांचा व्यवहार हा नेहमी लेखी हवा. तू तिला कर्ज म्हणून देतो आहेस की भेट?"



 "नाही नाही, आई मला भेंट नको आहे. आम्ही पैसे परत करू." सुनिता घाईघाईने म्हणाली.



"हो पण ते एका पेपरवर लिखित हवं, किती पैसे दिले व केव्हा परत करणार."


"काय ?"


"अगं आई ती माझी सख्खी छोटी बहिण आहे.  तिला मदत हवी असताना असं करण योग्य दिसेल?"



  "आई ते सर्व का? माझ्यावर विश्वास नाही? मग मला नकोय पैसे तर." सुनिता रागावून म्हणाली.



 "तसं नाही ग पोरी विश्वास आहे पण वेळ सांगुन येत नाही. मी अनुभवानी सांगते समजून घे."



" खूप वर्षांपूर्वीची घटना आहे, माझ्या लहानपणीची. आमच्या शेजारी सुरेश दामले  राहत होते. दामले काकांना  एक मुलगा व एक मुलगी, त्यांचे मोठे भाऊ रमेश दुसऱ्या गावात रहात. त्यांचे आईवडील कधी इथे तर  कधी तिथे रहात. सुरेशकाका नोकरीमुळे इथे रहात . तिकडे  त्यांच्याकडे गावात  शेतीवाडी होती. ती मोठे भाऊ पहात. मोठ्या काकांना  दोन मुली  व बर्याच नंतर झालेला एक मुलगा होता."



"सर्व छान चाललं होतं. पुढे आईवडील वारले. दोन वर्षे लगातार पाऊस पाणी कमी झालं. त्यामुळे शेतीतून फारसं उत्पन्न नाही मिळालं. त्यातून मोठ्या काकांच्या मुलीचे लग्न ठरलं होतं. सगळीकडूनच कोंडी झाली. त्यामुळे मग त्यांनी धाकट्या भाऊ सुरेशकडे मदत मागितली. सुरेश काकांनी आपले कर्तव्य समजून भावाला मदत म्हणून एकरकमी  पन्नास हजार रुपये दिले.


लग्न व्यवस्थित पार पडले.त्यावेळी सुरेश काका नोकरीत होते. मुलंही लहान होती त्यामुळे त्यांना त्या पैशांची तातडीने गरज नव्हती. म्हणून त्यांनी भावाकडून पैसे केव्हा परत करशील अशी विचारपूस केली नाही. काही लेखी पुरावेही नव्हते. पुढे भावाचे आकस्मिक निधन झाले. रमेश काकांच्या मुलांना याबाबतीत काहीच माहित नव्हतं.



बरीच वर्ष झाली. मुलं मोठी झाल्यावर इकडे मुलांच्या शिक्षणासाठी म्हणून सुरेश काकांना पैशांची अडचण आली तेव्हा ते आपल्या पुतण्या सोबत बोलले, पण त्यानी हात वर केले. म्हणाला बाबांनी आम्हाला याबाबत काहीच सांगितले नाही. शेती ही पैतृक असुनही  काही लेखी पुरावाही नव्हता मग काय करणार.



  माझे बाबा वकील त्यांच्याजवळ दामले काका आले, बाबांनी विचारले, "काही लेखी पुरावा?"


  दामले काकांजवळ तसं काहीच नव्हतं. त्यामुळे पैसे तर गेलेच पण नात्यातही कटुता आली. काकूंनी खूप बडबड केली. पण काय फायदा  म्हणून मला वाटतं. पैशाचा व्यवहार नेहमीच लेखी असावा."



  दुसऱ्या दिवशी सुनीता जरा गुमसुमच होती. रात्री सुनिताचे मिस्टर सुनील आले. सुनिता रागातच होती. तिने सर्व हकिकत नवर्याला सांगितली , " पहा  आईचा आपल्यावर विश्वास नाही. तुम्हाला पटतंय कां हे असे लेखी देणं?"



  त्यावर हसुन सुनिल म्हणाले, ”हे बघ सुनीता ती तुझी आई आहे. ती तुम्हा दोघा भाऊ बहिणींवर सारखेच प्रेम करते हो न? आणि म्हणूनच त्या असं म्हणाल्या. त्यात काही चूक नाही. प्रेम आणि व्यवहार या दोन्ही गोष्टी व्यवस्थित पाळल्या तर पुढे संबंध चांगले टिकून राहतात मला सासूबाईंचं म्हणणं पटतय. तू ही जरा व्यावहारिक हो. काही गोष्टी भावनापेक्षा व्यवहारीक असलेल्या चांगल्या."


सकाळी सुनील उठून बाहेर आले. चहा पिता पिता ते म्हणाले, "आई तुमचं म्हणणं योग्य आहे, मला तुमचे म्हणणे पटते आहे. मी लेखी करारावर सही करायला तयार आहे." मग सुनील, सुरेखा आणि दादा ह्यानी  करारनाम्यावर सही करुन पैसे घेतले.


"आता तुझा राग गेला कि नाही?" आईने सुनिताला प्रेमाने जवळ घेत विचारलं.


"हो बाई नाही तर काही खरं नाही," वहिनी हसुन म्हणाली.


"काय ग वहिनी इतकी मी चिडकी नाही."


"बरं बरं ऐका तुम्ही तिघे ही."


 आईने घरांचे कागदपत्रे ही दाखवली. "हे बघा सुनील राव व सुनीता घर मी  दोघां मुलांच्या नावाने करती आहे. ते मी गेल्यावर तुम्ही विकले तर अर्धा वाटा तुमचा. तरी या कागदपत्रांवर ही सही करा.  तसेच माझे दागिने व  पण विकून पैसे वाटून घ्या."


“नको आई मला, लग्नात तुम्ही दिलेत ना तेवढे पुरेसे आहे. हे वहिनीला दे." सुनिता म्हणाली.


"बरं तेही लेखी करु. पण आधी हे पेपर नीट वाचुन विचार करून सही करा." पेपर नीट पाहून सुनिताने सुनीलच्या संमतीने सही केली.


"असेच समजुतीने घेतले तर पुढे जाऊन संपत्तीवरुन भांडण होणार नाही."


"हो खरंय," वहीनी म्हणाली, "आमच्या आत्याकडे आत्या गेल्यावर दोन्ही सुना दागिन्यांची मोजदाद करून खूप भांडल्या होत्या . त्यामुळे नंतर दोन्ही भावांनी एकामेकाशी बोलणं सोडलं. पुढे त्यांना पश्चाताप झाला पण काय फायदा. तेव्हा नीट विचार करून ठरव."


"केला विचार मी," सुनिता म्हणाली तशी मग दोघांच्या सहीने सुनीताला पैसे मिळाले. नात्यातले प्रेम वाढले व मनातले किल्मिष ही दूर झाले...

------------------------------------------  

वरील कथा सौ. प्रतिभा परांजपे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्द चाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.

फोटोवर क्लिक करून वाचा एक भावनात्मक कथा 






Post a Comment (0)
Previous Post Next Post