निसर्गाचे वाण

निसर्गाचे वाण

✍️  प्रतिभा परांजपे 

पल्लवी ऑफिसमधून घरी आली. स्कूटर स्टॅन्डला लावून लिफ्टकडे जाण्यास वळली. समोर देशपांडे काकूंच्या किचनच्या खिडकीतून खमंग तीळ भाजल्याचा सुवास पसरला होता.

ओ, दोन दिवसावर संक्रांत आली. आपली तर काहीच तयारी नाही अजून.

 या नव्या मल्टिमध्ये येऊन पल्लवीला दोन महिने झाले होते. आत्ता कुठे घर नीट लागले होते. जुन्या घरातून येताना कितीतरी जुन्या बाटल्या, प्लास्टिकचे डबे तिने कामवालीला दिले. इथे आल्यावर नवीन घेतले.

सध्या संक्रांत आल्याने बाजार ही रंग बिरंगी प्लास्टिकच्या  वाणांच्या वस्तूंनी भरलेला होता. पल्लवीच्या ऑफिसमधल्या कितीतरी मैत्रिणींनी असे रंग बिरंगी प्लास्टिकचे डबे संक्रांतीसाठी म्हणून विकत घेतले होते. बऱ्याच मैत्रिणींनी ऑफिसमध्ये  वाण देऊन हळदीकुंकू केले.

पल्लवीला या सगळ्या वस्तूंपेक्षा काहीतरी वेगळं घ्यावं जेणेकरून पर्यावरणाला हातभार लागेल अशी इच्छा होती.

पल्लवीला लहानपणीचे आजीच्या हातचे तिळगुळाचे लाडू आठवले. आज्जी खमंग तीळ भाजून खलबत्त्यात कुटून लाडू बनवायची.

संक्रांतीच्या आदल्या  दिवशी आज्जी पल्लवीला तिळाच्या तेलाने  मालिश करून न्हाऊ घालायची.

जेवणात भोगीची भाजी असायची, न आवडणार्या भाज्या ही त्यात छान लागतं.

"ही अशी मिश्र भाजी कां, ?" 

आज्जीचे उत्तर असायचे, "सगळंच आवडेल ते मिळत अस नसतं. त्यात थोडे नावडते मिसळले तरी दोन्ही चा स्वाद घ्यायचा."

त्या वयात त्यांच्या अर्थ नसे समजत  पण  भाजी छान लागायची.

संक्रांतीच्या दिवशी आई व आज्जी दोघी छान लुगडं नेसून, नाकांत नथ घालून, समोरच्या मंदिरात सुगडाच  वाण ताटात घेऊन जायच्या. पल्लवी ही  छान फ्रॉक घालून मिरवायची .

 मंदिरात जाऊन एक मातीचा सुगड देवापुढे ठेवून मग पांच जणींना वाण द्यायच्या.  

घरी येताना ताटात परत चार वाण असायचे, त्यावर असलेल्या लाडू वरून तिचे व ताईचे भांडण व्हायचे.

उन्हाळ्यात त्या मातीच्या  सुगडात पाणी भरून 'आमचा छोटा माठ' म्हणून जेवताना पल्लवी व ताई घेऊन बसत.

 आज्जी गेल्यानंतर काही वर्षांनी बाबांनी नवीन ठिकाणी घर घेतले .

काही दिवस आई जुन्या कॉलनीत जायची पण मग हळूहळू नव्या कॉलनी सर्व जण रमले. आणि काही वर्षात जुन्या पद्धती ही बंद पडल्या. हळूहळू घरोघरी हळदी कुंकवाची पद्धत कमी होत गेली.

आज ऑफिसमध्ये सुकन्या काळी साडी नेसून आली. ते पाहून तिची पहिली संक्रांत आहे असे लक्षात आले .

मिसेज भट्टाचार्य विचारत होती, "काली साडी क्यों??"

 "वो हमारे यहां  शादी के बाद पहले साल काली साडी ..."

"बापरे , काली? काला रंग तो.."

 पल्लवीला  काही उत्तर देता आले नाही.

रात्री आईशी बोलताना तिने हा प्रश्न केला.

“माहित नाही ग  बाई, आम्ही नाही विचार केला,” आईने काहीतरी उत्तर देऊन विषय बदलला.

सकाळी सकाळी बाबांचा फोन आला. त्यांनी तिच्या  बर्याच शंकांचे समाधान केले.

बाबा म्हणाले,  फार पूर्वी प्लास्टिक नव्हतेच आणि प्लास्टिक पिशव्या, प्रकृती साठी विनाशकारी आहे म्हणून मातीची सुगड, तेवढीच कुंभाराची मदत."

  पल्लवीने ऑफिसला निघता निघता सोसायटीचा सेक्रेटरी दामले काकांना फोन केला.
"काका आजच्या सुविचारच्या बोर्डावर मी काही लिहिले तर चालेल??"

        "हो हो आवडेल.".

पल्लवीने बोर्डावर पतंगाचा एक चित्र काढून त्याच्या खाली मेसेज लिहिला.

नमस्कार

“तिळगुळ घ्या गोड बोला.  आज मकर संक्रांत. सूर्याचा धनू राशीतून मकर राशीत प्रवेश म्हणजेच संक्रमण. म्हणून संक्रांत हा सण. त्याला गोड करायला स्नेहवर्धक तीळ आणि गुळाचा गोडवा. म्हणून ही तिळगुळ खाण्याची पद्धत आहे .

काळा रंग हा उष्मा शोषक असल्याने थंडीमध्ये आलेल्या या सणाला नव्या सुनेला किंवा नव्या बाळाला नवे काळे वस्त्र देण्याची परंपरा सुरू झाली असावी. 

 १४ जानेवरी हा दिवस मराठ्यांच्या पराक्रमाची आठवण देणारा. आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी लढून  त्यांनी प्राणांची आहुती दिली त्याची ही आठवण करून देणारा आहे.

आनंद  साजरा करताना आपणत्यांना ही शब्दरूपी  श्रद्धासुमने वाहू या.🙏🙏🙏

एक दिवस संध्याकाळी घरी येता येता पल्लवी वाटेत असलेल्या नर्सरी मधे जाऊन आली. अनेक रोपांची तिने आर्डर दिली.

आॅफिस मधल्या नीनाची वहिनी शिवण काम करते. तिच्या कडून पतंगाच्या आकाराचे कापडी बटवे शिवून मागितले.

सर्व तयारी करून झाली. तिळगुळाचे लाडू तेवढे करायचे उरले .

प्रशांतने विचारले, "का ग लाडू जमतील का तुला?"

" म्हणजे काय?"

 "नाही म्हणजे लाडू  खाय करता की माराय करता बनवते आहे?" हसत हसत प्रशांतने विचारले.

"काहीतरीच काय रे बोलतोस."

"अगं माझ्या लहानपणचा किस्सा सांगतो तुला. आमच्या शेजारी साठे वहिनी राहत होत्या. त्यांनी कधी लाडू केले नव्हते पण मनात उत्साह  खूप होता.

 सगळी तयारी केली लाडू केले पण ते इतके कडक  झाले की दाताने तुटे ना. आम्ही मुलांनी एकमेकांना मारायला सुरुवात केली. दामल्यांचा राजू म्हणाला, कंचे खेळायचे जागी लाडूचा उपयोग करावा का? अशी मजा आली होती. म्हणून विचारतोय?"

“काय रे हा फाजिलपणा? येतात रे मला मी काही पाकातले करणारच नाहीये.”

बोलता बोलता पल्लवीने लाडू तयार केले. " बघ झालेत ना?"

“कसे झाले ते बघू? खाण्यासाठी कि खेळण्या ?" हाताने बाॅल फेकायची नाटक करत प्रशांतने विचारले?

"आधी देवा समोर ठेव मग खा रे," म्हणत बाकी लाडू  डब्यात ठेवले..

दुसऱ्या दिवशी रथसप्तमीच्या दिवशी संध्याकाळी हळदी कुंकू करायचे म्हणून पल्लवीने ऑफिसमध्ये सुट्टी घेतली.

नीनाची वहिनी सुमनला फोन करुन तिळगुळ घ्यायला ये हळदीकुंकू करते आहे सांगितले.

 सुमनने बरीच कारण पुढे केली, पल्लवीने  सगळी खोडून काढली.

" वहिनी अगं इतक्या सुंदर पतंग पिशव्या कोणी शिवल्यात असे शेजारच्या काकू विचारत होत्या. तुला पुढे अजून आर्डर मिळतिल तेव्हा येच."

इतका प्रेमळ आग्रह  वहिनीला हो म्हणावे लागले. चला आता सोसायटीत आजुबाजुला राहणार्या  बायकांना निमंत्रण करायला हवे .

शेजारच्या सोनलला बरोबर घेऊन तिने सोसायटीच्या बायकांना बोलावणे केले.

पंत, व साठे वहिनींचे मिस्टर जाऊन बरीच वर्षे झाली तरी त्या हळदीकुंकू समारंभाला यायला संकोच करतात हे सोनालीने सांगितले होते म्हणून पल्लवीने त्यांना, ”मी नवीनच आले आहे. माझे घर पहायला या. त्या निमित्ताने ओळख वाढेल. तेव्हा तिळगुळ घ्यायला नक्की या" असा प्रेमाचा आग्रह  केला तो त्यांनी स्विकारला.

बाहेरच क्षमा भेटली. क्षमाने लग्न नाही केलं. तिला ही ये नक्की म्हणून बोलावलं.

संध्याकाळी दारासमोर सुंदर रांगोळी काढून घर सजवले.

छान लुगडं नेसून नथ घालून तयार झाली.

"वाह क्या बात है",  म्हणत  प्रशांतने पल्लवीचे निरनिराळ्या पोज मध्ये फोटो काढले.

आलेल्या सर्व मैत्रिणींना पल्लवीने हळदीकुंकू लावून,  तिळगुळाचा लाडू व चटकदार भेळ खायचा दिली.

ओटीच्या खिचडीत बोर, मटारच्या शेंगा, घालून   पतंगाच्या आकाराचे कापडी बटवे दिले.

सर्व सख्यांना  वाण काय आहे ची उत्सुकता होती. पल्लवीने सुगडाच्या आकाराच्या रोप लावलेल्या मातीच्या कुंड्या वाण म्हणून सर्वांना दिल्या. त्यात काही फुलझाडे तर काही औषधी तर काही तुळस, गोड लिंबू अश्या कुंड्या होत्या.

प्रत्येकाला त्यांच्या आवडीचे रोप मिळाले.

त्या सुबक, फुललेल्या कुंड्या  मिळालेल्या पाहून सर्वांनी कौतुक केले.

"वाssछान कल्पना आहे हं. आता एक उखाणा ही हवा हं".

"बरं बरं घेते‌ ऐका,

मातीच्या कुंडीत लावून रोप, प्रकृतीच ठेवा भान,

प्रशांतच नांव घेतें ठेवून सर्वांचा मान."

सर्व सख्यांनी टाळ्या वाजवून पल्लवीच कौतुक केले. 

वन्स मोर वन्स मोर म्हणत सर्वांनी एकच कल्ला केला

"बर -बर घेते ऐका.

मातीच्या कुंड्या वापरून प्लास्टिकला करते टाटा,

प्रशांतचा पल्लवीच्या  सुखात सिंहाचा वाटा.”

सर्व मैत्रिणींनी  “क्या बात है क्या बात है” म्हणून टाळ्या वाजवल्या.

व आपापल्या घरी निघाल्या.

समाप्त

फोटोवर क्लिक करून पाहा एक सुंदर नवी कथा



वरील कथा सौ. प्रतिभा परांजपे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्द चाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित.


Post a Comment (0)
Previous Post Next Post