सुनेचे कन्यादान
सौ. प्रतिभा परांजपे
आश्रमातल्या संध्यापूजेची वेळ झाली. एक एक करत सगळे पुरुष, स्त्रिया हाॅलमध्ये जमा होत गेली.
वीणाताई, केळकर ताईंचा हात धरून त्यांना सोबत घेत प्रार्थनेला आल्या.
'शुभंकरोती' पासून सुरू होत 'ओम जय जगदीश हरे' पर्यन्त पाच सहा आरत्या म्हणेपर्यंत सात वाजले. आरती स़ंपल्यावर वीणाताईंनी माधवरावांच्या फोटोला नमस्कार केला व त्या हाॅल मध्ये आल्या.
सात वाजता आश्रमातील सदस्य स्त्रियांबरोबर वीणाताई टीव्ही वर येणारी एक मालिका नियमित पहात. त्या मालिकेमुळे आपण ही घरातल्यांच्या सोबत असल्यासारखे त्यांना वाटायचे.
मालिकेतल्या पात्रांचे वागणे, आपसातील संबंध यावर मग त्या आणि केळकर ताई गप्पा मारत, कधीतरी मालिकेच्या कथेवरुन वाद विवाद ही करत तेवढाच विरंगुळा वाटे.
आठपर्यंत जेवण झाली कि वीणाताई जरा वेळ शतपावली करत. नऊ वाजता इतर सर्व सदस्य आपापल्या खोलीत झोपायला जात.. वीणाताई व केळकर ताईंची एकच खोली होती.
वीणाताईना निशाचा त्यांच्या सुनेचा एक दिवसाआड फोन येत असे.
आज फोन येणार म्हणून त्या जाग्या होत्या. बराच वेळ झाला निशाच्या फोनची वाट पाहता पाहता वीणाताईंच्या डोळ्यासमोर आनंदचा चेहरा तरळला.
आनंद त्यांचा एकुलता एक मुलगा होता, अभ्यासात हुशार , शिक्षण पूर्ण होताच बँकेत नोकरी लागली आणि वीणाताई आणि माधव रावांना त्याच्या लग्नाचे वेध लागले, पण-- आनंदने परस्पर निशाशी लग्न ठरवले .
अनाथाश्रमात वाढलेली, बारावी पास निशा दिसायला खूप सुंदर ,अल्हड पण जरा वेंधळीच. पण स्वभावाने निरागस.
या उलट वीणाताई नीटनेटक्या वक्तशीर कामसू , निशाचा वेंधळेपणा त्यांना अजिबात खपत नसे. त्या तिला बरेच वेळा रागवत समजावत, "हे बघ निशा"आजकालच्या जगात इतक वेंधळेपणा बरोबर नाही." आणि दुसरं म्हणजे निशाला कोणी नाव ठेवू नये या करता त्या तिला बोलत.
आनंदला हे सर्व आवडत नसे यावरून त्याचे आणि ताईंचे बरेच वेळा वाद होत.
माधवराव ही वीणाताईंना समजावत, "अग ती आईविना पोर आहे जरा सांभाळून घे," पण वीणाताईंच म्हणणे, "म्हणूनच मी तिला वळण लावते, मी तिच्या चांगल्यासाठीच करते."
सर्व छान चालले होते.
माधवराव रिटायर होऊन दोन वर्षे झाली , आता संसारातून ही निवृत्त व्हावे म्हणून ते व वीणाताई पंधरा दिवस देवदर्शनाला नाशिक त्रंबकेश्वर फिरायला गेले.
जाताना त्या निशाला घराबाबत नीट समजावून गेल्या.
माधवराव म्हणाले, "ही अगं आता फिरायला जातोय काळजी सोड.."
पण देवदर्शनाहून परत आले तो घरात चोरी झाल्याची बातमी कळली. निशाच्या वेंधळेपणाचे एक आणखीनच उदाहरण समोर आले. आनंद म्हणाला, "आई तिने मागचे दार नीट बंद केले नव्हते चोरांना फावले".
वीणाताईंना झालेल्या नुकसानापेक्षा सुनेच्या बेजबाबदारपणाचे दुःख जास्त होते, पण आनंद समोर त्या काही बोलल्या नाही. तरी व्हायचे ते झालेच. आनंद निशाला खूप बोलला रागाने बाहेर निघून गेला.
आताशा आनंदचा चिडचिडेपणा वाढतच चाललासा वाटत होता
नेमके कारण काही कळत नव्हते, एक-दोनदा माधवरावांनी विचारले, "कां रे ऑफिसमध्ये काही??" तर स्पष्ट असे बोलला नाही निशाला तर विचारण्यात अर्थच नाही.
दिवस आपल्या गतीने पुढे सरकत होते.
तो दिवस वीणाताईंना आठवला. आनंद असाच काहीसा चिडूनच कामावर गेला. येता येता आनंदच्या गाडीला मोठा एक्सीडेंट झाला. सर्वच संपलं.
डोळ्यासमोर लाडक्या लेकाचा शरीराला अग्नी देताना माधवरावांच्या पायातले त्राणच गेले. त्यांना सावरावे की या अल्लड सुनेला? वीणाताईची खरी परीक्षा सुरू झाली
निशाचे दुःख पाहून त्यांचा जीव कळवळत असे.
आता त्यांच्यातल्या सासूने आईची जागा जणू घेतली. त्यां निशाची लेकीप्रमाणे काळजी घेऊ लागल्या.
हळूहळू निशा सावरली पण माधवराव नाही सावरले, ते गेलेच.
आता निशासाठी त्यांनी आपले दुःख बाजूला ठेवले.
काळ कोणासाठी थांबत नाही. वीणा ताईंनी निशाला पुढचे शिक्षण घ्यायला लावले, ग्रॅज्युएट होता होता निशा ही प्रगल्भ झाली. वीणाताईंचे ही आता वय बोलू लागले. त्यांना निशाची काळजी वाटत होती. इतक्या लहान वयात झालेला आघात, आणि पुढे येवढं मोठ आयुष्य एकट्याने जगणं.
आता त्या निशा साठी स्थळ शोधू लागल्या.
निशाला लग्नासाठी तयार करणे म्हणजे त्यांच्यातल्या आईपणाचा कस लागणार होता..
बघता बघता एक वर्ष पूर्ण झाले.
आता निशा एका प्रायव्हेट आफिसमधे काम करू लागली. त्या मुळे तिचा वेळ छान जाऊ लागला.
वीणाताई माधवरावांच्या वर्षश्राद्धाला आश्रमाला भेट द्यायला म्हणून गेल्या असताना तिथल्या संचालकांशी त्यांची चांगली ओळख झाली.
त्यानंतर मधून मधून वीणाताई आश्रमात जात असत. त्या आश्रमात काही मदत लागल्यास तत्पर असत. तिथल्याच एका सद्गृहस्थाने निशाकरता अमोलचे स्थळ सुचवले अमोल --अमेरिकेत सॅटल्ड , पहिला घटस्फोट झालेला होता.
स्थळ एकदम उत्तम होते. अमोलला पाहून वीणा ताईंना क्षणभर आनंदचा भास झाला.
अमोलला निशा पसंत पडत आहे तरीही निशा लग्नाला तयार होत नव्हती.
आनंदला विसरण आणि त्याची जागा दुसर्याला द्यावी या विचाराने कावरीबावरी झाली होती.
वीणाताईंनी तिची खूप समजूत काढली. त्या निशाला म्हणाल्या, "लग्नाची घाई नाही. तु अमोलला भेट. घरी बोलव आणि जर तुला योग्य वाटल तरच हो म्हण."
"आई मला लग्नानंतर त्यांच्या सोबत अमेरिकेत जावे लागेल.."
"हो पण प्रत्येक मुलगीच नवर्यासोबत जाते माहेर सोडून."
पण निशाचे म्हणणे, 'मी एकदा आई नसल़्याच काय दुःख असते अनुभवलं आहे.'
"आई तुला या वयात एकटं सोडून दूर देशात मी कशी राहू? माझं मन कस आनंदात राहील?"
निशाची काळजी वीणा ताईंना समजत होती.
"अग, पण मी पिकल पानं त्याचा काय भरोसा. केव्हाही गळून पडेल पण त्याआधी तुला सुखात पाहायची इच्छा आहे. अमोल सारखा चांगला जोडीदार देवाने तुझ्या नशिबात लिहून ठेवला आहे. नाही म्हणू नको .."
"पण आई मी गेल्यावर एवढ्या मोठ्या घरात एकटी कशी राहशील तू? तू ही आमच्या सोबत चल."
"हो बरोबर म्हणते तुमची लेक," अमोलने ही दुजोरा दिला.
"तुझे सासरे, माझा आनंद यांच्या स्मृति या जागेत आहे. त्यासोडून मी कशी तुझ्यासवे येऊ?"
"पण मग तुझी काळजी कोण घेणार? मला तिथे कसं चैन पडेल?"
त्यावर वीणाताई म्हणाल्या, "मी वृद्धाश्रमात राहिले तर तुला चालेल कां? तिथे माझ्या ओळखीचे बरेच लोक आहे". .
"मी एक सुचवू कां आई? आपण जर हा बंगलाच वृद्धाश्रमाला दिला तर ? आपले घर ही तुला सोडून जावे लागणार नाही आणि एकटेपणा ही जाणवणार नाही."
निशाचा सल्ला वीणाताईंना पटला. त्यांनी वृद्धाश्रमाच्या संचालकांची गोष्टी केल्या. त्यांना वृद्धाश्रमाससाठी जागा हवीच होती.
वीणाताईंनी बंगला वृद्धाश्रमाला दान दिला. संचालकांनी आश्रमा ला हवी ती व्यवस्था करवून घेतली . वीणाताई ही त्यातच राहू लागल्या. वृद्धाश्रमाला आनंदाश्रम असे नाव दिल .
पुढच्या सगळ्या गोष्टी मग पटापट झाल्या .
निशाचे लग्न अमोलशी आनंदाने पार पडले. सुनेला लेक मानून तिचे कन्यादान केले. काही दिवसांनी निशा व अमोल अमेरिकेला गेले.
वीणा ताईंच्या मनाला आपली लेक दुरावली ह्याचे दुःख होते पण कुठे तरी सुनेचं आयुष्य मार्गी लागलं, तिला योग्य जोडीदार मिळाला ह्यांचे मनाला समाधान वाटत होते.
आता त्या निश्चित मनाने आश्रमात राहू लागल्या.
"अगं केव्हाचा फोन वाजतो आहे तुझ लक्ष कुठे आहे? माझी झोप सुद्धा उघडली," केळकर आजींनी वीणाताईंना हलवले, त्यांच्या आवाजाने वीणाताई भानावर आल्या आणि फोन वर निशाचा आवाज ऐकून उत्साहाने बोलू लागल्या..
-----------------------------------------
लेखन.सौ.प्रतिभा परांजपे
वरील कथा सौ. प्रतिभा परांजपे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.