कुचंबणा

 *कुचंबणा*

✍️ प्रतिभा परांजपे 

 अमृताने   फुलांचा हार करून आईच्या फोटोला घालून  नमस्कार करत आई तुझ्या अमुला क्षमा  कर ग म्हणत रडू लागली.

तिला रडताना पाहून बाबांनी अमृताच्या पाठीवर हात फिरवत तिला शांत केले.
"अमृता अग आई होती तुझी, तुझ्यावर राग नाही तिचा".

 बाबा म्हणत अमृता सुरेशरावांच्या कुशीत शिरली.

  आईला जाऊन आज बरोबर एक वर्ष झाले. अमृताला तिचे बालपण आठवले. नम्रता ताई आणि अमृता, नम्रता आईची लाडकी तर अमृता  बाबांची.

 अमृताचे लग्न  सौरभशी ठरले. सौरभला दिल्लीला नौकरी होती.

नम्रता ताईचे सासर उज्जैन म्हणजे इंदौर जवळच.

"मला इतक्या दूर का पाठवतेस "?? असे अमृता ने म्हणताच "अगं या काही हात च्या गोष्टी असतात का हे तर ज्याचं  त्याचं नशीब आहे. आणि दूर आहे म्हणून हातात आलेलं चांगलं स्थळ सोडून देऊ का "?

"अगं याच देशात आहे ना बघ त्या सरदेसाईची मुलगी अमेरिकेत आहे, त्यामानाने दिल्ली काहीच दूर नाही. विमानाने तर दोन तासात पोहोचता येते ."

हाताने विमानाची  एक्टिंग करत बाबा बोलले तशी अमृतासकट सगळे हसू लागले.

"एका माणसाला सौरभ इतका आवडला आहे तर आम्ही  तरी नाही कसं म्हणणार "??नम्रताने तिला चिमटा काढून भोळेपणाचा आव आणत म्हटले तशी "काय ग ताई" म्हणत अमृता लाजून पळाली.

लग्न होऊन अमृता आता दिल्लीला स्थायिक झाली. वर्ष भरात तिला छान नोकरी लागली. पुढे स्वप्निल व साक्षीचा जन्म झाला  त्यावेळेस तिच्या सासूबाई बरोबर होत्या.

बाबा रिटायर्ड झाले त्याच सुमारास नम्रताताईचा स्कूटर अपघात झाला त्यामुळे आई व बाबा ताईजवळ तिच्या घरी राहू लागले. जवळ जवळ एक वर्ष लागले ताईला बरे व्हायला.

  भाऊजी तिथे नव्हते त्यामुळे ताईला आई बाबांची खूप मदत झाली .

काळ आपल्या गतीने पुढे सरकत होता आई बाबांच पण वय जाणवायला लागल.

सौरभला प्रमोशन मिळालं पण ट्रान्सफर ही झाली. आई - बाबा अमृता कडे रहावयास आले.

आई-बाबा आल्याने अमृताला खूप आराम झाला घरी कोणीतरी आहे या भावनेने ती कामात जास्त लक्ष देऊ लागली..

एक दिवस तिला यायला उशीर झाला घरी आली तो वातावरण गंभीर होते. आईची साक्षीशी काहीतरी वादावादी चालली होती.

"अमू जरा हिच्या कपड्यांकडे लक्ष दे काय घालते? इतके उघडे छोटे कपडे बरे दिसतात कां?  आणि काय हा भडक मेकअप?"

 "आजी आमच्या सगळ्या मैत्रिणी असेच कपडे घालतात आणि मी पार्टीला जाते आहे मग काय सलवार कुडता , दोन वेण्या घालून जाऊ ? काकूबाई म्हणतील मला", साक्षी चिडून म्हणाली.

"आई-- मी पाहते समजावते तिला," म्हणत अमृताने आईला शांत केले.

"साक्षी आईसमोर जरा नीट रहा. आणि आई तू पण थोडं समजून घे, हे दिल्ली शहर आहे हे आपलं छोटं गाव नाही. आज- काल अशीच फॅशन आहे" असे म्हणत अमृताने विषय बदलला.

दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये सौरभ आला तेव्हाचा प्रसंग अमृताला‌ आठवला.

खूप दिवसांनी सौरभ घरी आला म्हणून त्याचा व मुलांचा प्रोग्राम ठरला.
"बाबा आज आपण मस्तपैकी आउटिंग  जाऊया ना, तिथेच खाऊ पिऊ "??

अमृताने "हो  जाऊया, मी आईला सांगते."

तेवढ्यात अमृताची आई, शोभाताई म्हणाल्या, "अगं दिवाळीच्या फराळाची भाजणी आज भाजून ठेवूया. तू मला ते साहित्य काढून दे अनारस्याचे पीठ पण करून ठेवू,"

"अग आई  सौरभ आज बाहेर जायचं म्हणतात आहे आपण भाजणी उद्या करू"?

"अग बाई आता दिवाळी डोक्यावर आली केव्हा तयारी होणार"?

"रेडीमेड आणू, भाजणी मिळते इकडे आज-काल." अमृताने विषय संपवला.

 "हो बाई सर्व मिळते पण-- त्याला घरची  चव कशी येणार?"

"हो ग-- पण यांनाही चार च दिवस सुट्टी आहे!"

"बघ बाई तू म्हणशील तसं !" आई बोलली --पण मनातून ती नाखूष आहे हे दिसत होते...

एक दिवस  गोड खाऊन  कंटाळा आला म्हणत सौरभ चिकन घेऊन आला.

"अरे हे काय ? आई बाबा नाही खात ."

"ठीक आहे आपण खाऊ या."

अमृताला कळत नव्हते सौरभला कसे समजावे. आईला तर वास ही सहन होत नाही.

त्या दिवशी आई काही न खाता तशीच झोपली, मग अमृताला ही जेवण गेलं नाही , काय करावे?

 आईच्या म्हणण्याप्रमाणे चालावे तर सौरभ नाराज त्याचेही बरोबर आहे. चार दिवसासाठी आला आहे आपल्या घरी.

 सौरभ परत गेला नी आईचा मूड परत  आला, सर्व तिच्या  मनाप्रमाणे  होत होते.

 बाबा कधी कधी आईला म्हणत, "अगं हा संसार तीचा आहे शोभा, आपण गरज पडली तरच लक्ष घालायचे त्यांना त्यांचे निर्णय घेऊ द्यावे."

पण जन्मभर आपल्याच मर्जीने आई वागली तो स्वभाव सहजासहजी कसा बदलणार? त्यातून  ताई आजारी होती त्यामुळे  ताईकडे आईवर सगळी जबाबदारी होती म्हणून  ती ठरवेल त्याप्रमाणे.

लवकरच सौरभची ट्रान्सफर दिल्लीला परत झाली प्रमोशनवर. खूप मोठी पार्टी केली अमृताने. ताई व भाऊजी पण आले जाताना आई-बाबांना घेऊन गेले. सौरभ आल्याने अमृताची काळजी मिटली , मुलं आनंदात होती,  घराला घरपण आले.

असेच दिवस चालले होते .एक दिवस नम्रता ताईचा फोन आला "अगं सोनाच्या बाळंतपणासाठी अमेरिकेला जायचे आहे दोन-तीन महिने तरी तिकडे राहणार."
अमृता समजली ताई काय म्हणू इच्छिते तिने आई बाबांना इकडे येण्याविषयी गोष्टी केल्या.

 सौरभ जरी बोलला नाही तरी तो फारसा खुष दिसत नव्हता, काही इलाज नव्हता.

 आई बाबा आले मुल मागच विसरून खूष होती.आज्जीच्या मागेपुढे करत होते.

 काही दिवस छान गेले पण परत ये रे माझ्या मागल्या.

 सौरभची भुणभुण तर आईची तणतण तिच्या कानावर येऊ लागली. आई बोलता-बोलता भाऊजी कसे शांत किती समजूतदार वगैरे वगैरे सांगत असे आणि सौरभला ते मुद्दाम वाटत असे,
"मी काय त्रास देतो ग यांना?"

"अरे तू मनाला लावून नको घेऊ तिचे बोलणे, तिकडे असली की इकडचं कौतुक करत असते" असे म्हणून अमृता सौरभचा मूड ठीक करायचा प्रयत्न करे.

 एक दिवस साक्षी आणि स्वप्नीलचे भांडण झाले. आईने स्वप्नीलची बाजू तर सौरभ साक्षीची बाजू.

 अशा अनेक घटनांनी अमृताचे मन अस्वस्थ होत असे , आईची बाजू घ्यावी तर नवरा नाराज आणि आईला नको पडू या सगळ्यात म्हणावं तर 'हो बाई काही झाले तरी मी परकी' असा आईचा त्रागा .

मग मग तर अमृताने या सगळ्याकडे लक्ष देण सोडून दिलं.

 ताईने परत यायचे कळवले तेव्हा आई खूप उत्साहात होती. 'किती दिवस झाले ग तुला भेटून' म्हणत तातडीने रिझर्वेशन करवले.

 अमृताला आॅफिसच्या कामाने बाहेरगावी जायचे होते, तिने मी आल्यावर जा मी पण येईन असे सुचवले पण आई हट्टालाच पेटली बाबांचा नाईलाज होता.

  अमृता परत आली तेव्हा आईबाबा निघून गेले होते, आपले सर्व सामान घेऊन.

अमृताला काहीच कळेना, ताईला फोन केला तेव्हा तिच्या कडून सर्व कळले.

"अमृता वाईट नको वाटून घेऊ आईचा स्वभाव तू जाणतेस म्हातारपणी तिला जिथे आवडेल तिथेच तिने राहावे हे योग्य नाही कां?" असे म्हणून अमृताची समजूत काढायचा प्रयत्न केला. 

अमृता समजायचे ते समजली. आपण आईला आनंदी ठेवू नाही शकलो याचे तिच्या मनाला खूप लागले.

 बाबांनी तिची नेहमीप्रमाणे समजूत काढली, "अगं जरा काही काळ जाऊ दे तिचा राग निवळेल मग येऊ आम्ही."

पण ती वेळ आलीच नाही आणि आई अचानक जग सोडूनच गेली.

 आई व सौरभ दोघ ही आपलेच, पण या दोन विरुद्ध स्वभावाच्या माणसांना आनंदी ठेवण्या च्या प्रयत्नात अमृताची किती कुचंबणा झाली ते  ती कोणाला सांगणार होती.??

-------------------------------------------सौ. प्रतिभा परांजपे

वरील कथा प्रतिभा परांजपे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.




Post a Comment (0)
Previous Post Next Post