सुखी संसाराची गुरुकिल्ली

   सुखी संसाराची गुरुकिल्ली (अक्षरचाफा कथा स्पर्धा)

      ✍️ शोभा वागळे     
रखमाने आतून आपल्या सुनेला हाक मारली, "बाय मंजू, आज शिदोरी घेऊन शेतावर जाईल का? आज माझ्या अंगात कणकण हाय, जाईल कां तू?
"होय माय, जाईन की!" असे म्हणून मंजू जायची तयारी करू लागली. तिच्या सासूने सगळी तयारी करून ठेवली. पाण्याची कळशी भी भरून ठेवली.
मंजूला अर्धा तास झाला तयारी करायला. सासूने पुन्हा हाक मारली, "मंजे, चल ये बिगी बिगी. लई वखत झालाय. बाप लेक भुकेलं असंल!"
शेतावर जायचं तरी मंजू बाजारात जायची तयारी केल्यागत नटून तयार झाली. तिच्याकडे पाहून रखमा गालात फक्त हसली. काही झालं तरी तिच्या भावाचीच पोरगी सून म्हणून आणलेली. 'आता म्याच सांभाळून घ्यायला हवं', म्हणून रखमा शांतच राहिली.


मंजू दोन चार वेळा शेतावर गेली होती सासू सोबत, पण आज तिला एकटीलाच जावे लागणार होते. मनातून थोडी ती धस्तावली होती, पण सासूचे ऐकायला हवे अन् पतीदेवालाही बघता येणार होतं, म्हणून ती जायला तयार झाली. सासूने तिच्या डोक्यावर शिदोरीची टोपली व कडेवर  कळशी दिली आणि जायला सांगितले. मंजू कोपऱ्यातली चप्पल घालू लागली तशी रखमा बोलली, "अगं व्हाणं कशापायी घालतीया, शेतावर तर जायचंय!"
"पण पायाला दगड लागतील ना?"
"काय भी लागत नाय, जा तशीच."
मंजू नाईलाजाने तशीच निघाली.


त्यांच शेत घरापासून जरा लांबच होतं. त्यांच्या शेता अगोदर
आणखी दोघा तिघांची शेतं होती. मंजू इकडं तिकडं पाहत डुलत डुलत चालली होती. बांधावरून चालताना तिचा पाय घसरला आणि ती खाली पडणारच होती, इतक्यात जवळच शेतात काम करणाऱ्या रामूने तिला आधार दिला. तो तिलाच पाहत होता. ती पडणार एवढ्यात त्याने तिला साभांळले. शिदोरीची टोपली रामूने झेलली, पण कळशीतले अर्धेअधिक पाणी सांडलेच.


मंजू घसरताना घाबरली होतीच, त्यात रामूने आधार दिल्याने तिची धडधड जास्तच वाढली. कशीबशी सावरत रामूचे आभार मानून ती तिच्या शेताकडे निघाली. तिथे काम करणाऱ्या बाया जोराने ओरडल्या, "अगं मंजे! जपून चाल की, घाई कशापाई करतीया. अन् आज तुझी माय नाय तुझ्या संगती?"
"मायला बरं वाटत न्हाय म्हणून मी एकटीच आलीया"
"असं व्हय. जा बरं नीट."


नेहमी पेक्षा आज दुपारच्या जेवणाला उशीर झाला होता. शेतात बाकीचे लोक आप आपले जेवण घेऊन बसले होते. मंजूचा सासरा आणि नवरा मात्र अजून शेत नांगरत होते. तिला येताना पाहून गणू त्याच्या बापाला म्हणाला, "बा, मंजू येतेयं, आता काम थांबवुया." त्याच्या वाडीलांनीही लगेच नांगर थांबवला आणि बैलांना मोकळं करून गणूला त्यांना चारा पाणी द्यायला सांगितले. दोघे हात पाय धुऊन येई पर्यंत मंजुने दोघांना वाढून ठेवले. आज झुणका भाकर व मिरचीचा ठेचा होता. ते बघून बाप लेक दोघे म्हणाले, "वाह! आज झक्कास हाय बेत! भूक भी जाम लागलीया."
"घ्या खाऊन, मायने भी भरपूर दिल्यात भाकऱ्या", मंजूने सांगितले.
"मंजे, तू भी खा आमच्या संगती."
"नको. मी माय संगत खाते."
तेव्हा बा म्हणाला, "अगं बाय, दोन घास खा. गणू, दे तिला तुझ्यातले."
तिने किती ही नाही म्हटले तरी झुणका भाकरीचा घास गणूने तिच्या हाती दिलाच अन् तिला तो खावाच लागला. नवऱ्याच्या हातून घेतलेला घास तिला आवडल्याने आणखी चार घास कधी खाल्ले तिला कळलेच नाही. त्यांच जेवून झाल्यावर ती परतली.


आता ती घाई घाईने चालू लागली. आपण दोन घास खाल्ले, पण सासू घरी आपल्याकरता जेवायची थांबली असणार म्हणून ती झपझप चालू लागली. वाटेत दुसऱ्या बायका तिला थांबायला सांगत होत्या पण, 'माय जेवायला थांबलीये' असं सांगून ती चालतच राहिली. मागे त्या बायका ह्या सासू सुनेच्या प्रेमळ नात्याबद्दल बोलत होत्या.


खरंच ह्या सासू सुनेचे नाते खूपच छान होते. साधारणपणे भावचीच मुलगी सून म्हणून आणली तरी आत्याची सासू झाली की ती सगळ्या सासवांसारखीच सासुरवास करताना पाहायला मिळते, पण मंजू खरंच भाग्यवती होती. सासू सुनेचे मेतकूट छान जमले होते. भावाची मुलगी मागून आणली तर तिला नेहमी आनंदित ठेऊन आपल्या गणूचा संसार सुखाचा करावा असे ध्येय आत्याचे होते, आणि आता सासू असली तरी आपण आपल्या प्रेमळ आत्याला सदा खुश ठेवावे असा विचार करून मंजू एकमेकांना साभांळून राहत होती.


मंजू घरी आली तेव्हा सासू झोपली होती. मंजूने त्यांना हाका मारल्या तरी त्या उठल्या नाही. मग तिने "माय, ए माय, उठ ना" असे म्हणून ती त्यांना हलवून उठवायला गेली तर तिला जाणवले की त्यांना खूप ताप भरला आहे. तिने त्यांना उठवून घरात होती ती तापाची गोळी दिली आणि त्यांना पेज करून भरवली. थोड्या वेळाने त्यांना बरं वाटलं.


संध्याकाळी त्यांची खबर घ्यायला शेतातल्या बायका आल्या. बोलता बोलता मंजू कशी बांधावर पडली असती व रामूने तिला कसे सांभाळले, ही गोष्ट त्यांनी तिच्या सासूला सांगितली. मंजूने हे कुणाला सांगितले नव्हते. तिच्या मते ती मामुली गोष्ट होती. पण बायकांनी तिखट मीठ लावून सासूला सांगितले तेव्हा तिला फार चीड आली होती. सासूच्या तब्येतीचा बहाणा करून बाया येऊन आग लावून गेल्या. त्या बाया एवढ्यावरच थांबल्या नाहीत तर शेतावरून परतताना गणूला पण त्यांनी सांगितले, "आज रामूमुळे दुपारचे जेवायला मिळाले गणू तुला. रामू नसता तर सगळ जेवण सांडलं असतं", आणि मंजू कशी पडली असती हे रंगवून सांगितले. मंजूने ही गोष्ट दुपारी आपल्याला का नाही सांगितली यावर तो विचार करू लागला. त्याच्या मनात पाल चुकचुकली.


संध्याकाळी बाप-लेक घरी आले तेव्हा मंजूने रोजच्या सारखी त्यांना चा- बिस्कीटे आणून ठेवली. पण आज गणूचे कशातच लक्ष नव्हते. त्याने चहा नको म्हटले. आईने विचारले "काय झालं रं, कशापायी चा पीत नाहीस?"
तेव्हा त्याच्या रागाचे कारण त्याने सांगितले. ते ऐकून आई म्हणाली, "अरे, त्या बाया इथं भी आल्या व्हत्या, आणि मंजूनं भी मला काय झालं ते सांगितलं. मंजूची काय भी चूक नाय. रामू ऐवजी तू असतास तर कुणाला पडताना गुमान पाहत उभा राहिला असतास का? तू भी बाईला सांभाळलं असतंच ना?"
"गणू, एक सांगते, त्या बाया लई वंगाळ हायत. आपला सुखातला संसार त्यांच्या डोळ्यात खुपतो."
"अगं माय, ही गोष्ट मंजू मला का नाय बोलली. त्या बायांनी का सांगावं म्हनतो मी!"
"त्यात काय सांगायला पाहिजे. दुपारचं जेवण मातीत सांडलं असतं तर तिनं पडल्याचं सांगितलं असतं की!"
"माझ्या अंगात कणकण होती आणि नंतर ताप भी भरला होता. मंजूने दवा दिली आणि पेज भी करून भरवली. तेव्हा कुठं आता बरं वाटतंय. अरं, त्या बाया इथं भी येऊन आग लावून गेल्या. मेल्यांना आपलं सुख बघवत नाय."


हे सगळं ऐकल्यावर गणू शांत झाला. मायने मंजूला चा पुन्हा गरम करून आणायला सांगितला आणि तिनेही लगेच आणून दिला.


रामून मला सावरलं याचा नवरोबाला राग आल्याचं कळल्याने तिचे मन दुखावले व तिला खूप वाईट ही वाटले.
खरं म्हणजे मंजू तालुक्यात राहत होती. दोन चार बुकं पण शिकली होती. त्या मानाने गणू थोडा अडाणीच होता.
तिच्या बापाने व आत्याने त्या दोघांचे पाळण्यातच लग्न लावले होते. मंजूला गणू आवडत होता. लहानपणी दोघं बरोबर खेळत बागडत होती. पण वयात आल्यावर लग्नाचा विषय काढला. हुंडा वगैरे काही नसल्याने, आणि आपल्या आवडत्या माणसां बरोबर संसार करायचा म्हणून लग्न करून मंजू खेड्यात आली. तिला शेतातली कामं येत नव्हती, तरी तिच्या आत्याची ती लाडकी सून होती. तिचं वागणं खेड्यातल्या पोरीपेक्षा वेगळं होतं आणि तेच सगळ्यांच्या नजरेत येत होतं.


सहसा सगळीकडे सासू सूनेचं कधी पटतच नसतं. अडाणी असो वा शिक्षित, सासू सुनेच्या नात्याला एक अभिशाप लागल्यासारखे रोज खटके उडतातच. आता शिकलेले लोक बाहेर एक अन् घरात वेगळे वागतात पण अशिक्षित लोक सासू सुनेचे तंटे जग जाहीर करतात. पण मंजू आणि तिच्या सासूचे एक अजबच कोडे होते. त्या दोघांचा सलोखा खेडेगावातल्या कागाळ्या करणाऱ्या बायकांना खुपत होता. कुणाचा भांडण-तंटा झाला तर निवांत बसल्या असताना त्यांना चांगला विषय चघळायला मिळायचा.


मंजूचे लाड सासू करायचीच आणि तिचे सासरे ही तिचे मुली प्रमाणे कौतुक करत होते. तिला लिहिता वाचता येत असल्याने शेत मालाचे जमा खर्च पहायचे सगळे काम त्यांनी तिलाच सोपवले होते. मंजू ही मन लावून चोख कामे करत होती.


गणू रामूमुळे थोडा नाराज झाला याचे मंजूला वाईट वाटले होते. तो राग व्यक्त करण्यासाठी त्या रात्री ती सासूला बरं नाही म्हणून सासू सोबत झोपली होती, आणि गणूने हे बरोबर ओळखले होते. त्या रात्री त्याच्या बापाने सुद्धा चार गोष्टी त्याला समजावून सांगितल्या. बाजाराला जाणार तेव्हा तिच्यासाठी एक पातळ पण आणायला सांगितले. बायकांचा राग घालवण्या करता ही एवढी वस्तू दिली की बायका खुश होतात म्हणून सांगितले.

बापलेक आठवड्याच्या बाजाराला तालुक्याला जायचे तेव्हा कधी कधी मंजू पण आपल्या माहेरी जाऊन येत असे. रविवारी बाजाराचा दिवस होता. मंजूचे पण माहेरी जायचे ठरले होते, पण या वेळेला ती गेली नाही. सासूला बरं नाही हेच कारण सांगून ती घरीच थांबली. गणू ही तिचा राग समजून चुकला होता. बाजाराचं सगळं काम झाल्यावर त्याने  तिच्या करता साडी, बांगड्या आणि सर्वांकरता जिलब्याही घेतल्या. बाजारात रामू दिसताच तो मूद्दाम त्याच्याकडे जाऊन बोलला. 
"रामू, काल तुझ्यामुळे दुपारच्याला जेवायला मिळाले. तू मंजूला सावरले म्हणून झुणका भाकर खायला मिळाली. आणि तुझ्यामुळे मंजुला भी काही लागलं नाही. खूप आभार तुझे."
"अरे, त्यात काय आभार मानतो? मी बांधा जवळ होतो म्हणून ताईला सावरू शकलो. लांब असतो तर काहीच करू शकलो नसतो."
"आज सांजेला ये की घरी. जिलब्या घेतल्यात. समदे मिळून खाऊ"
'बरं बाबा, मी भी काही तिखट घेऊन येतो" असं म्हणून तो भजी घ्यायला दुकानात गेला.


संध्याकाळी रामू आपल्या छोट्या बहिणीला घेऊन गणूकडे चहाला आला होता. चहा पाणी घेताना सर्वांच्या छान गप्पा रंगल्या होत्या. गणूच्या आईला ही आता खूपच बरं वाटत होतं. मंजू पण गणूचा राग विसरली होती. नवीन साडी व आपल्या आवडीचा साडीचा रंग पाहून ती जास्त खुलली होती. बापाच्या सांगण्याने गणूने मंजुच्या मनाची तेढ ही नाहीशी केली होती.


अख्या गावात वाखाणण्यासारखे त्यांचे घर होते. चौघांच कुटुंब गुण्या गोविंदाने वावरत होते. कुठे बोट दाखवायला जागा नव्हती. सगळी नाती छान जुळून आली होती. ते चौघेही एकमेकांना समजून घेत होते. सासू सुनेचे नाते आई व मुली सारखे झाले होते. असा कौटुंबिक सलोखा आजकाल दुर्मिळ झाला असला तरी मंजूचे सासर त्याला अपवाद होते. पैसा अडका जास्त नसला, घरदार मोठे नसले तरी आहे त्यात समाधान मानून, एकमेकांना जीव लावणारी, गुण्यागोविंदाने राहणारी ही माणसे. सुसंस्कृतपणा आणि सामंजस्य हीच त्यांच्या सुखी संसाराची गुरुकिल्ली!!



                             समाप्त


शोभा वागळे
मुंबई.


Post a Comment (0)
Previous Post Next Post